Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Wednesday, December 9, 2009

विठ्ठल

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

-------------------------

आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदचे ॥१॥

काय सांगो झालें कांहीचिया बाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

--------------------------

अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥


जेव्हा जेव्हा हे अभंग मी ऐकतो तेव्हा तेव्हा मनात एक अनामिक भावना येते. ते काय हे मला ठरवता येत नाही. मनाला एक प्रकारची हुरहुर लागते. यात त्यातल्या संगीताचा वाटा मोठा. पण ते शब्द...पहिल्या अभंगात नामदेवांना जळी स्थळी काष्ठी जसं म्हणतात, तसं त्यांना विठ्ठल दिसतो. त्यांच्यासाठी सर्वकाही म्हणजे विठ्ठल. ह्यातला विठ्ठल मला काहीसा प्रतीकात्मक वाटतो. विठ्ठल म्हणजे तुम्ही ज्यासाठी जगताय ते. असं काही की ज्याच्यासाठी तुम्ही सर्व काही विसरु शकता ते. तुमच्यासाठी सर्व काही तेच होतं. नामदेवांसाठी ते तीर्थ होतं, क्षेत्र होतं, बंधु , गुरू पिता सर्व काही विठ्ठल. असा विठ्ठल नामदेवांना सापडला. तो काय़ हे मला माहित नाही. (पण तो विठ्ठल एखादी मुर्ति खचितच नसणार.) असा विठ्ठल खरच असतो का? मला तो सापडेल?

तुकारामांच्या भाषेत ह्याच अवस्थेला ते 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अस म्हणतात. आणि शेवटचा अभंग म्हणजे तर सगळ्याचा कळस...लता मंगेशकरांचे भैरवीचे स्वर ऐकताना खरच अमृताचा घनु वर्षतोय अस वाटतं.... हे तीनही अभंग एकाच अवस्थेचे वर्णन करतात. ती अवस्था काय ते नाही मला सांगता येणार.

Tuesday, December 8, 2009

नास्तिक

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा खरंतर गाभाऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण की
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची….

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा
कोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच….

म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
तेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,
पण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे!!....

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून....
तुमचा विश्वास नसेल आमच्यावर;
पण आमचा आहे ना!!!!!....

एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात
तेंव्हा कुठे अनंत वर्षे घेऊ शकतो आपण दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे......
एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........
- संदीप खरे

Saturday, May 30, 2009

सुहास शिरवळकरांच्या 'दुनियादारी' या कादंबरी मधल्या या काही आवडलेल्या ओळी....

"तुझं प्रेम हे खरं आणि सर्वव्यापी आहे रीन. जगाच्या पाठीवर कुठही गेलं तरी आपण आकाशाचं अस्तित्व नाकारुच शकत नाही. पण रीन, म्हणुन कोणी आकाशाखालीच निवारा शोधत नाही ! त्यासाठी घराच्या अस्तित्वाची गरजही तितकीच प्रखर असते ! तू माझं आकाश आहेस; श्रद्धा माझा निवारा आहे ! मी तुझं आकाश आहे; धीरुभाई तुझा निवारा आहे ! आकाशानं आकाशाइतकंच भव्य राहावं रीन. त्यानं कोणाच्या निवारयाचं छप्पर होऊ नये. "

Saturday, April 18, 2009

राजहंस माझा निजला

हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला'

दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही
जें आनंदेही रडते, दु:खांत कसें ते होई


हे कुणी कुणां सांगावे
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गावा जावें
मग ऐकावें या बोला, 'राजहंस माझा निजला"

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला

ते तिच्या जिवाचें फूल
मांडीवर होत मलूल
तरि शोके पडुनी भूल
वाटतची होतें तिजला, 'राजहंस माझा निजला'

जन चार भोंवतीं जमले, मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा, हतभागी मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा आतां असला

ते चित्र दिसे चित्ताला
हे चित्र दिसे डोळ्यांला
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां, 'राजहंस माझा निजला'

करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

हें दूध जरासा प्याला, आतासा कोठें निजला
डोळ्याला लागे डोळा, कां तोच भोवतीं जमलां?
जा, नका उठवुं वेल्हाळा, मी ओळखतें हो सकलां

तो हिराच तेव्हा नेला
हिरकणीस आता टपला
परि जिवापलिकडे याला
लपवीन, एकच मजला, राजहंस माझा निजला

कां असलें भलतें सलतें, बोलतां अमंगळ याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकीन सकलां
घेतें मी पदराखालीं, पाहूंच नका लडिवाळा,

मी गरीब कितिही असलें
जरी कपाळ माझें फ़ूटलें
बोलणें तरी हें असलें
खपणार नाहिं हो मजला, राजहंस माझा निजला

हें असेच सांगुनि मागें, नेलात जिवाचा राजा
दाखाविलाही फिरुनी नाहीं, नाहीत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां, राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा
पाहुनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला


कवी - गोविंदाग्रज

Saturday, February 28, 2009

सागरास...

स्वा. सावरकरांच्या स्मृतिला अभिवादन म्हणुन त्यांची ही महान कविता...


सागरास...

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला